पुणे : ‘झाडांचे सैनिक होऊ या, चला, झाडांना आळे करू या...’ अशी गर्जना करत, असंख्य निसर्गप्रेमी पुण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त एकवटले. ‘वनराई’ आणि ‘आंघोळीची गोळी’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘आळेयुक्त झाडे’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. लोकमान्यनगर येथील जॉगर्स पार्कच्या प्रवेशद्वाराजवळील झाडांना आळे करून या उपक्रमाला सुरुवात झाली.
या वेळी खा. वंदना चव्हाण, डॉ. सतीश देसाई, माधव पाटील, अंकुश काकडे, नगरसेवक धीरज घाटे, श्याम मानकर, दिलीप सेठ, नितीन जाधव, दिलीप मेहता, अमित वाडेकर, धनंजय देशपांडे, विद्यार्थी आणि ‘आंघोळीची गोळी’चे कार्येकर्ते उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत निसर्गसंवर्धनासाठी नव्या स्वातंत्र्य संग्रामाची सुरूवात झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. झाडाला लागूनच सिमेंट, डांबर, पेव्हिंग ब्लॉक लावून झाडांचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे. झाडांच्या हक्काची जमीन आणि पाणी या साध्या मूलभूत गरजा त्याला मिळाव्यात, या उद्देशाने ‘वनराई’ आणि ‘आंघोळीची गोळी’ यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले, ‘राष्ट्रीय हरित लवाद’च्या २०१३ च्या आदेशानुसार प्रत्येक झाडाला एक मीटर व्यासाचे आळे पाहिजे. त्यामुळे झाडाला जगण्यासाठी पुरेसे पाणी आणि वाढण्यासाठी हक्काची जमीन मिळेल. त्याद्वारे नैसर्गिकरित्या जलपुनर्भरण होईल. शहरात झाडांचे गळे हे सिमेंट, डांबर आणि पेव्हिंग ब्लॉकने आवळलेले असतात. यामुळे झाडांच्या बुंध्याजवळ झिरपणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. त्यामुळे झाडे कमकुवत होऊन एक दिवस उन्मळून पडतात.’